ठाणे प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरातून बेपत्ता झालेल्या ७ वर्षीय मुलीचा अवघ्या ३६ तासांत शोध घेण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि समन्वयित तपासामुळे चिमुकलीला सुखरूपपणे तिच्या कुटुंबीयांकडे परत आणण्यात आले. या कारवाईमुळे मुलीच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला असून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिवा परिसरातील एक ७ वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. या प्रकरणात दिवा आणि मुंब्रा पोलीस ठाण्यांच्या पथकांनी संयुक्तपणे काम केले. पोलिसांनी या प्रकरणी सात पथकांची नेमणूक केली. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. तसेच तांत्रिक माहिती आणि स्थानिक सूत्रांच्या मदतीने मुलीचा शोध घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. अनेक ठिकाणी चौकशी करून पोलिसांनी शोधमोहीम वेगाने पुढे नेली. अखेर सलग प्रयत्नांनंतर ३६ तासांच्या आत बेपत्ता मुलीचा शोध लागला. बदलापूर येथून मुलीला पोलिसांनी सुरक्षितपणे ताब्यात घेतले. पोलिसांनी तिला तिच्या पालकांकडे सोपवले. मुलगी सुखरूप असल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला. या यशस्वी कारवाईबद्दल ठाणे पोलीस प्रशासनाने संबंधित पथकाचे कौतुक केले आहे. हरवलेल्या मुलांशी संबंधित प्रकरणांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाते आणि अशा घटनांमध्ये तातडीने कारवाई केली जाते, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनीही पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे. वेळेत केलेल्या शोधकार्यामुळे एका कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून पोलिसांच्या कार्यक्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
